MPSC (एमपीएससी) घेणार ऑनलाइन परीक्षा

एमपीएससी घेणार ऑनलाइन परीक्षा

एमपीएससीने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली आहे…ऑनलाइन-ऑफलाइनच्या खेळात विद्यार्थी मात्र द्विधा मनःस्थितीत आहेत.

महाराष्ट्र लोक सेवा आयोग भरती 2020

राज्यात अराजपत्रित पदांच्या भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राबवाव्या की महाआयटी विभागाने, याबाबत राज्यात विद्यार्थ्यांचे दोन गट पडले असतांनाच, आता एमपीएससीने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी एमपीएससीने महाआयटी विभागाप्रमाणे खासगी आयटी कंपनी नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याला सुरुवात केली आहे. एमपीएससीकडून आतापर्यत ऑफलाइन परीक्षा घेण्यात येत असल्याने, विद्यार्थ्यांचा एमपीएससीला पाठिंबा होता. मात्र, आता एमपीएससीनेच ऑनलाइन परीक्षांची तयारी केल्याने, राज्यात स्पर्धा परीक्षांचे तयारी करणारे विद्यार्थी द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.

सध्याच्या परिस्थितीत एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या पदभरतीच्या परीक्षा लेखी (ऑफलाइन) पद्धतीने घेतल्या जातात. मात्र, तंत्रज्ञानामुळे होत असलेले बदल आत्मसात करून त्यानुसार कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न एमपीएससीकडून करण्यात येत आहे. त्या दृष्टीनेच ऑनलाइन परीक्षांचे पाऊल टाकण्यात आले आहे. संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रियेतून खासगी कंपनीची निवड केली जाणार आहे.ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांवर संपूर्णपणे आयोगाचेच नियंत्रण असेल. मोठ्या प्रमाणात उमेदवार असलेल्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार नाहीत. त्याचप्रमाणे ऑनलाइन परीक्षा सायबर कॅफेमध्ये न होता आयोगाकडून परीक्षेसाठीची संस्था निवडली जाईल. या ऑनलाइन परीक्षेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख करण्यात येणार आहे. त्यासाठीचा विशेष नियंत्रण कक्ष एमपीएससीच्या कार्यालयात असेल. आयोगाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीतच ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे, असे निविदा प्रक्रियेतून स्पष्ट होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकारात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती पदभरतीची प्रक्रिया होणार आहे की नाही, याबाबत कोणीच बोलायला तयार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.

एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी एमपीएससी प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येत आहे. निविदा प्रक्रियेतून ऑनलाइन परीक्षेसाठी संगणकीय प्रणाली विकसित झाल्यानंतर, छोट्या स्वरुपाच्या परीक्षांचे ऑनलाइन माध्यमातून आयोजन करण्यात येईल.


कोरोना सोबत MPSC परीक्षेचे गणित –

‘परीक्षांसाठी एमपीएससीची लगबग’ ही बातमी (लोकसत्ता, ३ ऑगस्ट) वाचली. येत्या १३ सप्टेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा नियोजित आहे; जी ५ एप्रिलला होणार होती. आयोगाने परीक्षा घेण्यासाठी दाखवलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे आणि परीक्षा लवकरात लवकर होणे हे आम्हा उमेदवारांच्या दृष्टीने हिताचेच आहे. कारण करोनामुळे सर्वच क्षेत्रांत अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे आणि या पार्श्वभूमीवर परीक्षा होणे ही नक्कीच सकारात्मक बाब आहे.

परंतु यासाठी आयोगाची पूर्ण तयारी झाली आहे का, हा प्रश्न पडतो. कारण परीक्षा पुढे ढकलली तेव्हापासूनच आयोगाकडे परीक्षार्थीनी व विविध विद्यार्थी संघटनांनी परीक्षा केंद्र बदलून देण्याची सोय सार्वत्रिक असावी, यासाठी विनंती केली होती. याबाबत ‘एमपीएससी’ने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार केंद्रबदलाबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याच्या बातम्या आल्या, पण आजच्या तारखेपर्यंत तरी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही.

केंद्र बदलण्याच्या मागणीचे प्रमुख कारण म्हणजे करोनामुळे बहुतांश विद्यार्थी हे सध्या त्यांच्या मूळ गावी आहेत आणि त्यांनी अर्ज भरताना निवडलेली परीक्षा केंद्रे राज्यातील प्रमुख महानगरांतील आहेत. त्यामुळे जर केंद्रबदल होणार नसेल, तर सध्या तरी ३१ ऑगस्टपर्यंत टाळेबंदी असल्यामुळे आणि पुढेही काय परिस्थिती असेल ते आत्ताच कोणी सांगू शकत नसल्याने, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद असल्यास परीक्षार्थीनी त्यांच्या केंद्रावर पोहोचायचे कसे? राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही एकाच दिवशी दोन सत्रांमध्ये घेतली जाते. म्हणजे जवळपास दिवसभर राज्यभरच्या विविध केंद्रांत विद्यार्थी एकत्र जमलेले असतील. त्यातला एक जरी विद्यार्थी करोनाबाधित असेल तरी संसर्गाचा धोका वाढेल. आयोगाचे सहसचिव म्हणतात त्याप्रमाणे देशपातळीवर हा परीक्षेचा पहिलाच प्रयोग असेल. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, पण सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना केल्या हे लवकरात लवकर जाहीर व्हायला हवे.

आक्षेप परीक्षा घेण्यासंदर्भात नाहीच, पण आयोगाने शक्य होईल तेवढय़ा लवकर पुढील प्रश्नांचा खुलासा करणे आवश्यक वाटते : (१) परीक्षा केंद्र बदलून मिळणार की नाही? (२) प्रतिबंधित क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासंदर्भात काय उपाययोजना असतील? (३) सार्वजनिक वाहतुकीबाबत शासन आणि आयोग यांच्या समन्वयातून काही निर्णय झाला आहे का? (४) चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे आणि बायोमेट्रिक शक्य नसल्यास परीक्षार्थीची ओळख खात्रीपूर्वक कशी होणार? (५) परीक्षेच्या निमित्ताने एवढे परीक्षार्थी एकत्र जमतील तेव्हा संसर्ग होणार नाही याची जबाबदारी कोण घेणार?

Leave a Comment